महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय; महिला वकिल मारहाण प्रकरणी रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्री फडणविसांना संतप्त सवाल

बीड : मुख्यमंत्री महोदय हे फोटो पहा आणि तुम्हाला झोप कशी लागते ते सांगा? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ज्ञानेश्वरी अंजान मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाब विचारला आहे.
डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केली. ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे. लाठ्या काठ्या आणि पाईपच्या मदतीने केलेल्या या महाराहाणीत महिला वकील जबर जखमी झाल्या आहेत. वकील असलेल्या महिलेला जर मारहाण होत असेल तर या राज्यात कायद्याचा धाक किती आहे हे दिसून येते. या घटनेमुळे महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय, असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. असेही रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी म्हटलं आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय.
दुसरीकडे याच मुद्यावर बोट ठेवत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत या सरकारवर टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या एका महिलेला गावातील ध्वनीप्रदूषणाविरोधात कार्यालयीन तक्रार केल्याच्या कारणावरून सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात नेऊन बेदम मारहाण केली. काठ्या आणि लोखंडी पाईप वापरून झालेल्या हल्ल्यामुळे ती महिला बेशुद्ध पडली, आणि नंतर तिला केवळ एका रात्रीत रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकारच्या अपयशाची साक्ष देतो. एक वकील असलेल्या महिलेला जर संरक्षण नसेल, तर सामान्य महिलांचे काय? असा सवाल ही त्यांनी केला आहे. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर प्रशासनाने तात्काळ दोषींवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी. तसेच त्यांना कठोर शासन करावे. अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ केली आहे.
हेही वाचा – पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; भिडे पूल वाहतुकीसाठी तब्बल दीड महिना राहणार बंद
‘या घटनेला भाजप सरकारचं जबाबदार आहे’; नाना पटोले
हर घर में नल….नल में जल अशी घोषणाबाजी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलजीवन नावाची योजना या देशात आणली. ही योजना महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचं केंद्र झालेली योजना झालेली आहे. पाण्याचा सोर्स नाही, अशा ठिकाणी सरकारला योजना करण्याचा प्रयत्न केला आणि कोट्यवधी रुपयांचा जनतेच्या पैशाचा चुराडा केलाय. काल झालेली यवतमाळ जिल्ह्यातील दुर्दैवी घटना आहे. या घटनेला सरकारचं जबाबदार आहे. भाजपचं सरकारचं जबाबदार आहे. यावर्षी पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासणार. हे अलर्ट असताना विधानसभेतही आम्ही सरकारला मुद्दे सांगितलेले आहे. सरकार आणि प्रशासन हे दोन्ही झोपलेले आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निरपराध लोकांचे मृत्यू यावर्षी मोठ्या प्रमाणात होतील, म्हणून या घटनेपासून सरकारनी सतर्क व्हावं, पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या बाबतीत गांभीर्य लक्षात घ्यावं आणि स्वच्छ आणि सोयीने लोकांना पिण्याच्या पाणी मिळावं, अशा पद्धतीच्या उपाययोजना सरकारने कराव्यात, अशी टीका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भाजप सरकारवर केलीय.