मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी दुर्घटना होता होता टळली
प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटली, चालकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवाशांचा जीव वाचला

पिंपरी | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी एका खाजगी बसने अचानक पेट घेतला होता. टायर फुटल्याने बसने पेट घेतल्याची माहिती आहे. या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. बसने अचानक पेट घेतल्याने अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला आहे. चालकाने सर्व प्रवाश्यांना सुखरूप खाली उतरवलं त्यामुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. आगीवर अग्निशमन दल आणि यंत्रणेने नियंत्रण मिळवले आहे.
हेही वाचा – ‘दिल्लीतून निधी आणून मतदारसंघाचा विकास करणाराच योग्य खासदार असतो’; शिवाजीराव आढळराव पाटील
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसात वाजता आढेगावच्या हद्दीत खासगी बसचा टायर फुटला. त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्यानं संपूर्ण बसने पेट घेतला. या बसमध्ये ३६ प्रवासी होते. टायर फुटल्याची माहिती मिळताच बस चालकाने प्रसंगावधान दाखवलं आणि सगळ्या प्रवाशांना बसमधून उतवरून दिलं. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने सगळे प्रवासी सुखरुप बचावले. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने आग विझवली गेली.





