एचएसआरपीसाठी १५ ऑगस्ट शेवटची संधी; नंतर दंडात्मक कारवाई निश्चित

मुंबई : राज्यातील सर्व वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी (दुचाकी, तिनचाकी, चारचाकी, खासगी आणि व्यावसायिक) हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. परिवहन विभागाने यासाठी अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ निश्चित केली असून, त्यानंतर नियम तोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
दंडाची रक्कम १ ते १० हजार रुपयांपर्यंत असू शकते. वायुवेग पथकाद्वारे थेट ही कारवाई केली जाणार आहे. मात्र, १५ ऑगस्टपूर्वी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक केलेली असूनही फिटमेंटची तारीख नंतरची असल्यास, अशा वाहनधारकांवर दंड लागू होणार नाही.
एचएसआरपीमध्ये क्रोमियम बेस होलोग्राम, लेसर-एच्ड युनिक आयडी, आणि नॉन-रिमूव्हेबल स्नॅप लॉक असलेल्या टॅम्पर-प्रूफ प्लेट्स असतात. ही प्लेट सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. एप्रिल २०१९ नंतर विक्री झालेल्या नव्या वाहनांवर ही प्लेट आधीच बसवलेली असते.
राज्यातील एकूण २.१ कोटी वाहनांमध्ये ही प्लेट बसवणे आवश्यक असताना, आतापर्यंत केवळ २६ लाख वाहनांवरच ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ५२.५ लाख वाहनधारकांनी ऑनलाईन अर्ज केला असला तरीही, मोठ्या प्रमाणात अजूनही उदासीनता दिसून येते.
या आधी मार्च, एप्रिल आणि जून २०२५मध्ये मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही, तांत्रिक अडचणी, फिटमेंट सेंटरवरील गर्दी, प्लेट्सची मर्यादित उपलब्धता आणि ग्रामीण भागातील जागरूकतेचा अभाव यामुळे प्रक्रिया अपेक्षित गतीने झाली नाही. अनेक मेट्रो शहरांमध्ये सप्टेंबर २०२५पर्यंतचे स्लॉट आधीच भरले गेले आहेत, त्यामुळे वाहनधारकांना अपॉइंटमेंट मिळवण्यात अडचणी येत आहेत.
वाहनधारकांनी ही अंतिम संधी लक्षात घेऊन लवकरात लवकर एचएसआरपी बसवावी, अन्यथा मोठ्या आर्थिक दंडाला सामोरे जावे लागू शकते.





