पीएम किसान योजनेत राज्यात २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ
शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर; मान्यतेसाठी पाठपुरावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे
![Increase of 20 lakh 50 thousand beneficiaries in PM Kisan Yojana in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Dhananjay-Munde-780x470.jpg)
मुंबई | केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये आणि राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेत चौदाव्या हप्त्यापर्यंत ७० लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते. कृषी विभागाने विविध मोहीम राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ केली आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली.
सदस्य अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
हेही वाचा – गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण सुरू, ‘या’ तारखेपासून करता येणार एसटीचे बुकींग
मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्यातील ६५ हजार शेतकरी कागदपत्रांच्या किंवा ई केवायसी अशा तांत्रिक कारणावरून वंचित राहिल्या संदर्भात विविध सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या संबंधित ६५ हजार शेतकऱ्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी सादर केलेला आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच या योजनेमध्ये आणखी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची वाढ व्हावी, म्हणून राज्यस्तरावरून तसेच केंद्र स्तरावरून विविध मोहीम राबविण्यात येतील. तसेच डेटा एन्ट्री करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र संगणक व्यवस्था देण्यात येईल, असेही मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.
या लक्षवेधी चर्चेत सदस्य सर्वश्री प्रकाश आबिटकर, बच्चू कडू, सदस्य श्वेता महाले यांनी सहभाग घेतला होता.