लसीकरणाची गती मंदावली, तर महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येईल; तज्ज्ञांचा इशारा
मुंबई – देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. मात्र राज्यात सध्या लसींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत, तर जिथे लसीकरण सुरू आहे तिथेही लसींच्या कमतरतेची चिंता व्यक्त केली जातेय. अशात महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. महाराष्ट्र सरकारने पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण एक मेपासून सुरू न करता पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केल्यानंतर ही माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्रात दीड कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रात लस घेण्यासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींची संख्या नऊ कोटी इतकी आहे मात्र लसीकरण केवळ दीड कोटी लोकांचे झाले आहे. ही संख्या खूप कमी आहे’, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील तिसऱ्या लाटेसंदर्भातील भीती व्यक्त केली. ‘आपण वेगाने लसीकरण केले नाही तर लोक नोकऱ्या आणि इतर कामांसाठी आता घराबाहेर पडू लागतील आणि त्यामधून कोरोनाची तिसरी लाट येईल’, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
त्याचबरोबर कोरोनासंदर्भातील राज्यातील समितीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘पावसाळा सुरू झाल्यानंतर पाऊस आणि इतर समस्यांबरोबरच लसीकरण मोहीम चालवणे आव्हानात्मक होईल.’ तर कोरोना विषाणूच्या जीनोम रचनेसंदर्भात काम करणाऱ्या एका संशोधकाने ‘हा विषाणू अशापद्धतीने म्यूटेड होत राहिला म्हणजेच बदलत राहिला तर लसीकरणाचा काहीच फायदा होणार नाही. लसीकरणामध्ये आपण एवढा वेळ घालवला तर कोरोनाचा नवा विषाणू निर्माण होईल ज्याच्यावर लसीचा काही परिणाम होणार नाही’, असे म्हटले आहे.