राज्यात उन्हाचा तडाखा! विदर्भातील कमाल तापमानात वाढ; अकोला येथे पारा ४३.१ अंशावर

मुंबई : राज्यात सध्या कोरडे हवामान असून काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होत आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून यामुळे तीव्र उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहेत. उत्तर मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून विदर्भ आणि मराठवाड्यातही उन्हाची काहिली वाढली आहे.
वायव्य भारतावर समुद्रसपाटीपासून १२.२ किलोमीटर वर उष्णतेचा पट्टा तयार झाला आहे. तसेच १५ एप्रिल रोजी हिमालय प्रदेशात पुन्हा तीव्र पश्चिमी विक्षोभाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सध्या अनेक भागातील कमाल तापमानात वाढ झाली असून यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. मागील काही दिवस पावसाळी हवामान असल्याने कमाल तापमानात आणि किमान तापमानातही काहीशी घट झाली होती यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला होता.
हेही वाचा – ‘गारे पालमा कोळसा खाण प्रकल्प राज्याच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मात्र, उकाड्यात वाढ झाल्याने नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नुकताच मुंबईसह कोकण पट्ट्यातील काही भागात उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली होती. पुढील काही दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागात उष्ण आणि दमट वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला असून सोमवारी सोलापूर आणि सांगली आदी भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
रविवारी विदर्भातील बहुतांश भागातील कमाल तापमान सरासरीहून २ अंश सेल्सिअसने अधिक नोंदले गेले. यात अकोला येथे सर्वाधिक म्हणजे ४३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले जे सरासरीहुन २.४ अंशांनी तर शनिवारच्या कमाल तापमानाहुन १.१ अंशांनी अधिक होते. तर अमरावती ४२.४, चंद्रपूर ४१, गडचिरोली ४१, वर्धा ४२ आणि वाशीम येथील कमाल तापमान ४१.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मरठवाड्यात परभणी ४१,७ तर छत्रपती संभाजीनगर ४०.४ इतके कमाल तापमान नोंदले गेले. मध्य महाराष्ट्रातही जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर आणि जेऊर येथील पारा ४१ अंशावर पोहोचला. तर कोकण प्रदेशात सरासरी कमाल तापमानाहून २ ते ३ अंश अधिक कमाल तापमान नोंदले जात आहे. डहाणू येथे या प्रदेशातील सर्वाधिक म्हणजे ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.





