राज्यात उन्हाचा चटका कायम; ‘या’ जिल्ह्यांना उष्ण रात्रीचा इशारा
पुणे | राज्यामध्ये अनेक ठिकाणी उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. अशातच विदर्भातील वाशीम येथे आज राज्यातील उच्चांकी तापमानाची म्हणजेच ४१.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. आज राज्यात उष्ण आणि कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण रात्रीसाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
कर्नाटक, मध्यप्रदेश, विदर्भ, दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा अजूनही कायम आहे. राज्यामध्ये दिवसा उन्हाचा तडाखा असह्य होत आहे. तर रात्री प्रचंड उष्णता जाणवत आहेत. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता चांगलीच वाढलेली आहे. यातच सकाळी ढगाळ हवामान आणि रात्री वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.
हेही वाचा – निवडणूक विषयक तक्रारींसाठी ‘सी-व्हिजील’ची सुविधा
‘या’ जिल्ह्यांना उष्ण रात्रीचा इशारा
राज्यातील वाढते तापमान पाहता वाशीम, सोलापूर, अकोला, चंद्रपूर, जळगाव, बीड आणि ब्रह्मपूरी जिल्ह्यातील तापमान ४० अंशापेक्षा जास्त आहे. तर सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्ण रात्रीचा इशारा देण्यात आला आहे.