पालखी मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट अन्नपदार्थांची होणार तपासणी; अन्न -औषध प्रशासनाचा निर्णय

पुणे : पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या दिंड्यांना सामाजिक संस्था, व्यक्ती यांच्याकडून दिंड्यातील वारकरी भाविकांना अन्नदान व फळ वाटप केले जाते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुण्यातील अन्न आणि औषध प्रशासनने मोठा निर्णय घेतला आहे. पालखी मार्गावरील आणि नियुक्त केलेल्या थांब्यांवर तात्पुरत्या अन्न स्टॉल्सवर प्रशासनाकडून दक्षता वाढवण्यात आली आहे. तसेच, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हातील पालखी मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने येथील खाद्यपदार्थ स्टॉलची अन्नपदार्थांची तपासणी होणार आहे.
संत तुकाराम महाराज पालख्या पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून जातात. या तीनही जिल्ह्याचे नियोजन करण्यात आले आहे, पालखी मार्गावर १६ विसाव्याची ठिकाणे आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये १६ मुक्काम आहेत तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये १५ मुक्काम आहेत. त्यानुसार अन्न -औषध प्रशासनाने नियोजन केले आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या आदेशानुसार, पालखी मार्गावरील हॉटेल, हातगाड्या, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ स्टॉल येथील अन्नपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ३३ अधिकारी नियुक्त केलेले आहेत. प्रत्येक पथकात सहा किंवा सात अन्न सुरक्षा अधिकारी आहेत, जे मार्गात आणि थांब्याच्या एक दिवस आधी तपासणी करतील.
हेही वाचा – धोकादायक वाड्यांची वीज, पाणी तोडणार! वाडे रिकामे करण्यासाठी पुणे महापालिकेचा निर्णय
पालखी काळामध्ये विसावे, मुक्कामांच्या ठिकाणी जाऊन, त्या ठिकाणी अन्नपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अन्न परवाना आहे की नाही. नियमावलीनुसार अन्नपदार्थ शिजवले जातात की नाही, याविषयी तपासणी होणार आहे. अन्नपदार्थांचे नमुने घेतले जाणार आहेत. त्या दोषी आढळल्यास संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
“मोठ्या प्रमाणात होणारे प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्पुरत्या अन्न स्टॉल्सची आमच्या अधिकाऱ्यांकडून आगाऊ तपासणी केली जाईल. पथके नमुने घेतील आणि आवश्यकतेनुसार चाचणीसाठी आमच्या प्रयोगशाळेत पाठवतील,” अन्न आणि औषध प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी सांगितले आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी प्रवासादरम्यान वाटण्यात येणाऱ्या प्रसादाच्या गुणवत्तेची देखील तपासणी करतील. तसेच, स्वयंपाकासाठी तेलाचा किती वेळा पुनर्वापर केला गेला आहे हे तपासण्यासाठी आमच्याकडे टीपीसी (टोटल पोलर कंपाउंड्स) मीटर देखील आहे. मिरवणुका इंदापूर आणि नीरा येथे पोहोचेपर्यंत आम्ही आमची तपासणी सुरू ठेवू. पुढील तपासणी इतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून केली जाईल,” असे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.





