भूखंड घोटाळ्यावरून फडणवीसांचा विरोधकांना टोला म्हणाले, खोदा पहाड और चुहा भी नहीं निकला
नागपूर ः भूखंड प्रकरण घोटाळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. मुख्यमंत्री आणि भूखंड घोटाळा हे समीकरण महाराष्ट्राला नवे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. विधिमंडळ बाहेरील परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी विरोधकांना धारेवर धरलं.
त्यांचा आरोप म्हणजे खोदा पहाड और चुहा भी नहीं निकला. हे सर्व भूखंडाचे श्रीखंड खाण्याचे प्रकार आहेत. त्याचा त्यांना इतका सराव आहे की त्यांना माहितीच नाही की, नागपुरात गुंठेवारीत गरिबांची घरं ही २००१ नंतर निगलराइज करण्याचा प्रयत्न झाला. त्या घरातली ही घरं आहेत. त्यातले हे लेआऊट आहेत. २००७ रोजी विलासराव देशमुख यांनी हा निर्णय घेतला होता. ४९ लेआऊटपैकी १६ शिल्लक राहिले. त्यामुळे त्यांचा प्रयत्न आरोप लावून पळून जाण्याचा होता. परंतु त्यांची आम्ही पळताभुई थोडी केली. त्यांच्या आरोपांना चोख उत्तर आम्ही दिलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार ३ हजार २९ एवढ्या ग्रामपंचायती या आमच्या आल्या आहेत. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असो या सर्व भागांत आमची सरशी झाली आहे. सहा महिन्यांच्या कारभारावर ग्रामीण जनतेने पसंती दाखवली आहे, असं फडणवीस म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाजपच्या उमेदवारांना विजय मिळवण्याकरिता एक वातावरण तयार केलं. त्यामुळे जे लोकं आमच्या सरकारला नावं ठेवत होते. स्वत: इलेजिटीमेट असताना आमच्या सरकारला इलेजिटीमेट बोलत होते. त्यांना न्यायालयानं सांगितलं आहे की, आमचं सरकार लेजिटीमेट आहे. तसेच महाराष्ट्राच्या जनतेनेही हेच सांगितलं की, हेच कायदेशीर सरकार आहे. ही जनता याच सरकारच्या पाठिशी उभी आहे. त्यामुळे मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. कारण त्यांनी आम्हाला पसंती दिली, असंही फडणवीस म्हणाले.





