‘शाहांसोबत चर्चा, तिढा सुटला, लवकरच अंतिम निर्णय’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महायुतीमधील जागावाटपाबाबत गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबतचा निर्णय़ अंतिम टप्प्यात आहे. पुढील एक दोन दिवसांत ३०-३५ जागांवरील निर्णय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
गृहमंत्री अमित शहा यांच्याशी शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलत होते. ‘जागावाटपाबाबत गरज पडली तर शहा यांच्याशी आम्ही पुन्हा चर्चा करू. आता तिढा राहिलेला नाही ३०-३५ जागांवरील निर्णय बाकी असून त्याचाही लवकरच अंतिम निर्णय होईल’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा – मिरज विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा; अन्यथा ‘सांगली पॅटर्न’चा इशारा
‘राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असून आम्ही आता फक्त जिंकण्यासाठी काम करतो आहोत. आमच्याकडे मुख्यमंत्रिपदावरुन वाद होत नसतात’, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. ‘लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे’, या एका वाक्यात मुख्यमंत्र्यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्याबाबतचा विषय संपवला.
‘लाडकी बहीण’ योजना रद्द होणार नसल्याचा पुनरुच्चार शिंदे यांनी यावेळी केला. या योजनेला आम्ही आचारसंहितेमुळे ब्रेक लावलेला नाही. उलट ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरचे पैसे आगाऊ दिले आहेत. अॅडव्हान्समध्ये पैसे घेणारे नाही, तर अॅडव्हान्स पैसे देणारे हे सरकार आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. ‘महायुती सरकारने किती शासन निर्णय काढले ते वाचा. किती रद्द केले ते वाचू नका. जीआर वेळेवर काढले आहेत. त्याचा फायदा मिळू लागला आहे’, असे त्यांनी नमूद केले.





