महाविकास आघाडीतील बिघाडीच्या चर्चा फेटाळल्या, विधानपरिषदेच्या ६ जागा जिंकणार : बाळासाहेब थोरात
![मविआतील बिघाडीच्या चर्चा फेटाळल्या, विधानपरिषदेच्या ६ जागा जिंकणार : बाळासाहेब थोरात](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/मविआतील-बिघाडीच्या-चर्चा-फेटाळल्या-विधानपरिषदेच्या-६-जागा-जिंकणार-बाळासाहेब.jpg)
मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणं विधानपरिषदेची निवडणुकीची चुरस वाढणार हे स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस त्यांचा दुसरा उमेदवार मागे घेईल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, काँग्रेसनं दुसरा उमेदवार रिंगणात कायम ठेवल्यानं निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विधानपरिषदेचा कोटा २६ मतांचा आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, अपक्ष आम्हाला मतदान करतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमच्यावर उमेदवारी अर्ज मागं घेण्यासाठी सांगत नव्हते तर आम्हाला मदत करण्याबाबत चर्चा करत होते, असं थोरात यांनी म्हटलं. महाविकास आघाडीत कसल्याही प्रकारची बिघाडी नाही. विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीचे ६ उमेदवार विजयी होतील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
- विधानपरिषदेच्या निवडणुकीतील उमेदवार
भाजपकडून विधानपरिषदेसाठी प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेनं विधानपरिषद निवडणुकीसाठी सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमदेवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसनं भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. आता १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं निवडणुकीतील चुरस वाढली आहे.