उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणापासून वंचित? पाटलांनी सांगितलं नेमकं काय घडलं
![अजित पवार भाषणापासून वंचित? चंद्रकांत पाटलांनी सांगितलं नेमकं काय घडलं](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/अजित-पवार-भाषणापासून-वंचित-चंद्रकांत-पाटलांनी-सांगितलं-नेमकं-काय-घडलं.jpg)
मुंबई: प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये, देहू प्रकरणावरुन वाद निर्माण करण्याची गरज नाही, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना भाषणापासून वंचित ठेवल्याच्या राष्ट्रवादीच्या आरोपावर उत्तर दिलं आहे. मोदींनी स्वत: अजितदादांनी भाषण करावं असं म्हटलं, पण अजित पवारांनीच नकार दिल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हा वाद अनावश्यक आहे असंही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र, या सोहळ्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळाला. झालं असं की या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. मात्र, त्यांना इतक्या मोठ्या कार्यक्रमात भाषणाची संधीच देण्यात आली नाही, असा आरोप राष्ट्रवादीने करत हा महाराष्ट्राचा अमपमान आहे, असं म्हटलं. भाजपविरोधात राज्यभर आंदोलनंही करण्यात आली. त्यावर आता चंद्रकांत पाटलांनी तिथे घडलेला नेमका प्रसंग जसाच्या तसा सांगितला.
अजित दादांनी नकार दिला – चंद्रकांत पाटील
अजित पवारांना भाषणापासून डावललं का, यावर उत्तर देताना ते म्हणाले, “असं जर खरचं असतं तर अजित पवार एकदा तरी बोलले असते. मी स्वत: तिथे होतो. ज्यावेळी संयोजकांनी मोदींनी बोलावं अशी विनंती केली. तेव्हा मोदी हे जागेवरुन उठलेच नाही. ते अजित पवारांना म्हणाले की तुम्ही बोलायला हवं. तेव्हा अजित पवार म्हणाले की मी आधीच सांगितलं की बोलणार नाहीये. मी अगदी शेजारी होतो. मोदींची इच्छा होती की अजित पवारांनी बोलावं पण त्यांनी सांगितलं की कार्यक्रम पत्रिका ठरतानाच मी सांगितलेलं की मी बोलणार नाही. मोदींपेक्षा कोणी मोठं नाही. त्यांनी स्वत: अजित दादांनी पहिले बोलावं असं म्हटलं”.
प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये – चंद्रकांत पाटील
“प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये. हा अतिशय सामान्य प्रसंग आहे. यात अपमानाचा काहीच विषय नाहीये, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित दादांना बोलले. त्यामध्ये सगळंच आलं. अजित दादांना बोलायला न मिळणे यात महाराष्ट्राचा अपमान कसा झाला. देहूच्या संस्थानचे अध्यक्ष बोलले, पंढरपूरचे अध्यक्ष आणि आळंदीच्या अध्यक्षांनी सन्मान केला. आचार्य भोसलेंनी आभार मानले. यात महाराष्ट्राचा अपमानाचा विषय कुठे येतोय. जर देहूच्या संस्थानाला बोलायला मिळालं नसतं तर असं बोलता आलं असतं. हा अनावश्यक वाद निर्माण केला आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.