साताऱ्यातील बंटी-बबली अखेर अटकेत! तब्बल सहा वर्षे चालला पंतप्रधान मोदींची सल्लागार असल्याचा बनाव

सातारा | पंतप्रधान कार्यालयात सुरक्षा सल्लागारपदी कार्यरत असल्याची बतावणी करून लोकांना गंडा घालणारी साताऱ्यातील जोडी कश्मिरा पवार व गणेश गायकवाड या दोघांना सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात ८२ लाखांच्या फसवणूकप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. त्यांना सातारा येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जवळपास सहा वर्षांपूर्वी साताऱ्यातल्या २४ वर्षीय तरुणीच्या ‘उत्तुंग भरारी’च्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकल्या होत्या. यात संबंधित तरुणीनं विविध महत्त्वाच्या उपक्रमांसाठी केंद्र सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत मोठं यश मिळवल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच, या तरुणीची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नियुक्ती केल्याचाही दावा करण्यात आला होता. आपण कसं यश मिळवलं आणि केंद्र सरकारनं कशी आपल्याला ग्राम विकासासंदर्भातील प्रकल्पांसाठी थेट पीएमओची सल्लागार म्हणून नियुक्ती दिली, याचे दावे या तरुणीनंही तेव्हा मुलाखतींमध्ये केले. पण ६ वर्षांनंतर हा सगळाच बनाव असल्याचं उघड झालं. ही तरुणी म्हणजेच बुधवारी अटक करण्यात आलेली कश्मिरा पवार.
हेही वाचा – ‘१३ तारखेपर्यंत आरक्षण दिले नाही तर..’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
कश्मिरा पवार व गणेश गायकवाड यांनी सातारा, वाई, महाबळेश्वर, फलटण, कोरेगाव, कराड येथील अनेक धनिकांना वेगवेगळी कामे करतो असे सांगून फसवणूक केली आहे. ही रक्कम काही कोटींमध्ये आहे. आपल्या नावाची चर्चा नको व आपली फसवणूक झाली आहे याची चर्चा होईल म्हणून या धनिकांनी पोलिसात कोणतीही तक्रार केलेली नाही. जिल्ह्यातील अनेक बँकातून या व्यक्तींच्या नावावर वेगवेगळ्या माध्यमातून रक्कम दिली (ट्रान्सफर) गेली आहे. मात्र याबाबत पोलीस पातळीवर याचा तपास सुरू आहे, अशी माहिती सातारा शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी दिली.





