#CoronaVirus: यवतमाळमध्ये आणखी ११ जणांना कोरोनाची लागण, रुग्णसंख्या ६१ वर
यवतमाळमधील ११ जणांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झाल्याने चिंता वाढली आहे. या सर्व रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. त्यांचे चाचणी अहवाल सोमवारी प्राप्त झाले असून सर्वांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. रविवारी रात्री पाच आणि सोमवारी सकाळी सहा असे एकूण ११ जणांचे अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. यासोबत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ६१ झाली आहे. हे सर्वजण करोनाबाधित रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. याआधी करोनाची लागण झालेल्या १० जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
तीन दिवसांपासून यवतमाळच्या करोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनासह नगारिकही चिंताग्रस्त झाले आहेत. रविवारी तब्बल १६ नवीन करोनाबाधितांची भर पडली होती. त्यामुळे विलगीकरण कक्षात उपचार सुरू असलेल्या ‘अॅक्टिव्ह’ करोनाबाधितांची संख्या ५० वर पोहचली होती. जिल्ह्यात आतापर्यंत करोना संसर्गाची लागण झालेल्या ७१ रुग्णांची नोंद झाली आहे.
सध्या विलगीकरण कक्षात ६१ करोनाबाधितांसह २९८ संशयित भरती आहेत. रविवारी ३९ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं होतं. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात १६६ तर गृहविलगीकरणात ८२९ जण असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सांगितलं होतं. यापूर्वी करोना संसर्गाची लागण होऊन उपचार झालेल्या १० रुग्णांना सुट्टी झाली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील नगरसेवकांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
शहरातील प्रतिबंधित केलेल्या प्रभाग १० आणि २० मधील नगरसेवकांसोबत जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी रविवारी बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. या भागातूनच सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंग पाळावे, नमाजकरिता पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी मशिदीत जमू नये, प्रकृती ठीक नसल्यास तत्काळ आरोग्य विभागास कळवावे, यासाठी नगरसेवक जावेद परवेज अन्सारी व प्रा. प्रवीण प्रजापती यांनी फोनवरून नागरिकांना आवाहन करण्याचे सुचविले. रमजानचा पवित्र महिना असल्यामुळे या भागात दूध, फळ व भाजीपाला हे शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करावे. पवारपुरा ते इंदिरा नगर येथील नागरिकांच्या १०० टक्के करोना चाचणी करावी, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. दोन्ही नगरसेवकांनी त्यांच्या वतीने या भागातील ५५० घरांना धान्याच्या किट आलटून, पालटून देण्याचे ठरवले.