#CoronaVirus: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-332.png)
‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे…सरकार आता शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करणार आहे. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरू होणार असून ‘कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरू राहणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. ‘कोरोना’ प्रादुर्भावामुळे राज्यातील दूधव्यवसाय, दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे. दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित १२ लाख लिटर दूधापैकी १० हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे. खासगी बाजारात दूधाचा दर १५ ते १७ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे.
शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच ‘कोरोना’च्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले १० लाख लिटर दूध दूधसंस्थांच्या माध्यमातून २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केले जाणार आहे. त्या दुधाची भूकटी करून ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.