#CoronaVirus:वर्ध्यात 3 वर्षाच्या चिमुकल्यासह पाच जणांची कोरोनावर मात
वर्धा : जिल्ह्यात आज एकही नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झालेली नाही. वर्धा जिल्ह्यासाठी ही आनंदाची बातमी असली, तरी दुर्दैवाने सेवाग्राम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वाशिम येथील एका रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, आज जिल्ह्यातील 5 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. यात तीन वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.
वर्ध्यात आज सेवाग्राम रुग्णालयातील तीन तर सावंगी रुग्णालयातील दोन रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यात नवी मुंबई येथून आर्वी तालुक्याच्या जामखुटा येथे आलेल्या 3 वर्षाचा चिमुकला त्याची आई, काका आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील कोरोनाबधित तरुणीची आई आणि एक मुलगी अशा एकूण 5 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत डॉक्टरांनी टाळ्या वाजवून रुग्णांना निरोप दिला आणि निरोगी राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबईतून आर्वी तालुक्यातील जामखुटा येथे आलेल्या तीन जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सेवाग्राम येथील कोव्हिड रुग्णालायात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत तीन वर्षांचा चिमुकल्यालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर 14 दिवस उपचार केल्यावर त्यांची दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आली होती
मात्र, पुन्हा दुसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या चाचणीत ते कोरोनामुक्त झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आज त्यांना टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला. तर सावंगी मेघे येथील विनोबा भावे रुग्णालयात अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील मेंदूज्वराच्या आजारासाठी दाखल झालेल्या तरुणीसोबत तिची आई आणि दोन बहिणी सुद्धा कोरोनाबाधित झाल्या होत्या. त्यापैकी आई आणि एका बहिणीचा अहवाल 14 दिवसानंतर कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांनाही आज घरी सोडण्यात आले.