‘सोमय्यांच्या हनुवटीतून रक्त ओघळायला हवं होतं पण…’, भुजबळांच्या गंभीर आरोपाने खळबळ
!['सोमय्यांच्या हनुवटीतून रक्त ओघळायला हवं होतं पण...', भुजबळांच्या गंभीर आरोपाने खळबळ](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/सोमय्यांच्या-हनुवटीतून-रक्त-ओघळायला-हवं-होतं-पण-भुजबळांच्या-गंभीर-आरोपाने.jpg)
मुंबई |
राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं असून एकीकडे किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला तर दुसरीकडे नवनीत राणा आणि रवी राणा यांना झालेली अटक यामुळे सध्या खळबळ सुरू आहे. अशाच भाजप आणि महाविकासआघाडी असा एकच वाद पाहायला मिळतो. यावरुन सध्या आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
खरंतर किरीट सोमय्या यांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची काहीच गरज नव्हती अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी किरीट सोमय्या यांना झालेल्या जखमेवरही भाष्य केलं आहे. ‘त्यांना जर हनुवटीला लागलं होतं तर जखमेतून रक्त ओघळायला हवं होतं, ते रक्त पुसायला हवं होतं’ असंही छगन भुजबळ म्हणाले. ते माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
इतकंच नाही तर त्यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा चॅलेंजवरही वक्तव्य केलं. ‘राणा दाम्पत्याला जर मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करायचं होतं तर त्यांनी परवानगी घेऊन यायला हवं होतं. एकदा बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी काही मुस्लिम धर्मगुरू आले होते. त्यावेळी नमाज पडण्याची वेळ झाली होती. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना एक खोली दिली आणि नमाज पडण्याची परवानगी दिली. त्यांचे नमाज पडून झाल्यानंतर आपण चर्चा करू असंही त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे हनुमान चालीसावरून राज्यात घाणेरडं राजकारण सुरू असल्याची’ टीका भुजबळांनी केली आहे.