बीड पोलीस दलात मोठा फेरबदल : 606 कर्मचाऱ्यांच्या बदल्या; SP नवनीत कावंत यांचा मोठा निर्णय

बीड : बीड जिल्हा पोलीस दलातून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची बिघडती परिस्थिती आणि पोलीस यंत्रणेवरील वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील तब्बल 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या निर्णयाने बीडच्या पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर बीड पोलीस यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास उडाला होता. जिल्ह्यात दिवसाढवळ्या होणारे अपहरण, दरोडे, मारहाणीच्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासोबतच पोलीस खात्यावर सातत्याने होणारे आरोप आणि कामकाजावर उपस्थित होणाऱ्या शंका यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी हा कठोर निर्णय घेतला. बदली झालेल्या 606 कर्मचाऱ्यांमध्ये अंमलदारांचा समावेश आहे.
हेही वाचा – वैष्णवी हगवणे प्रकरणातील टीकेवरुन रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण; रोहिणी खडसेंवरही पलटवार
पोलीस अधीक्षक कावंत यांनी बदल्यांचे धोरण कठोरपणे राबवले आहे. ज्या भागात पोलीस कर्मचारी राहतात, त्या भागातून त्यांची बदली दुसऱ्या तालुक्यात करण्यात आली आहे. यामुळे कोणत्याही प्रकारे गैरप्रकार किंवा चुकीचे काम होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलीस दलात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू झाला आहे. राज्य सरकारने एकूण 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामुळे अनेक जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. बीडमधील या मोठ्या फेरबदलामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्याच्या दिशेने पावले उचलली जाण्याची अपेक्षा आहे.