महाराष्ट्रात दिवसाला ६ शेतकरी आत्महत्या, मागच्या ६ महिन्यात १२६७ शेतकऱ्यांनी संपवले आपले जीवन
![6 farmer suicides a day in Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Farmer-Suicides-780x470.jpg)
पुणे | केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असले तरीही राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मागील सहा महिन्यांत राज्यात १२६७ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वांत भीषण स्थिती आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
राज्यात एक जानेवारी ते ३० जून, या सहा महिन्यांत राज्यभरात १२६७ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक ५५७, छत्रपती संभाजीनगर विभागात ४३०, नाशिक विभागात १३७, नागपूर विभागात १३०, पुणे विभागात १३ आत्महत्यांची नोंद झाली आहे. सुदैवाने कोकण विभागात शेतकरी आत्महत्येची नोंद नाही.
हेही वाचा – अजित पवार गटाकडून सर्व २८८ जागांवर सर्व्हे; विदर्भातील ‘इतक्या’ जागा लढणार
जून महिन्यात खरीप पेरण्यांची लगबग सुरू असते. यंदा राज्यात सरासरी वेळेत मोसमी पावसाचे आगमन झाले. पेरण्याही वेगाने होत आहेत. एकीकडे ही समाधानाची स्थिती असताना दुसरीकडे राज्यात जून महिन्यात १९३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. पुणे विभागात १, नाशिक विभागात २२, छत्रपती संभाजीनगर विभागात ८३, अमरावती विभागात ७० आणि नागपूर विभागात १७ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. राज्यभरात जानेवारीत २३६, फेब्रुवारीत २१०, मार्चमध्ये २२९, एप्रिलमध्ये १९३, मे महिन्यात २०६ आणि जूनमध्ये १९३, अशा एकूण १२६७ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.