39 लाख शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा फायदा ; सरकारवर जवळपास 30 हजार कोटींचा भार!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Udhav-Thakarey.jpg)
मुंबई | महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा फायदा सुमारे 39 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती आहे. या कर्जमाफीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 29,800 कोटींचा भार सरकारवर पडणार असल्याची माहिती आहे.
आज शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी कशी करायची याबाबत विस्तृत चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. आधी व्यवस्था तयार केली जाईल आणि मग मार्च ते मे दरम्यान कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान आज महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची घोषणा केली होती. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्ज आणि अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठीत कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम 2 लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास 2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.