सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाने १५ हजार कोटींचे नुकसान! अहवाल तयार
![15,000 crore loss due to unseasonal rains in Sangli district! Report prepared](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Grapes.jpeg)
सांगली – जिल्ह्यात डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सलग चार दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष, ऊस आणि भाजीपाला पिकांचे तब्बल १३ ते १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तसा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.
जिल्ह्यातील द्राक्ष, ऊस, ज्वारी, हरभरा, भाजीपाल्यासह ११ हजार ९३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. २ डिसेंबर रोजी तर जिल्ह्याच्या अनेक भागांत सलग १४ ते १५ तास हा तुफानी अवकाळी पाऊस कोसळत होता. द्राक्ष बागांचे सर्वाधिक १० हजार ६३९ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शनिवारी राज्य शासनाकडे सादर केला. द्राक्षबागांचे नुकसान प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले नसले तरी सुमारे १३ ते १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना राज्य सरकारकडून मात्र अद्यापही नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश आलेले नाहीत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये सरकारविरोधात नाराजी दिसत आहे.
द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असून द्राक्षांचे घड कुजण्याच्या स्थितीत आहे. रब्बीच्या पिकांनाही पावसाचा फटका बसला. आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, वाळवा, मिरज, कडेगाव, पलूस, जत तालुक्यांतील ३८४ गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जोरदार पावसामुळे नऊ तालुक्यांतील ३८४ गावांमध्ये २६ हजार ८४२ शेतकर्यांच्या १० हजार ६३९.४७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबांगांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष मण्यांना तडे जाऊन द्राक्षांचे घड खराब होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.