नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर शनिवारी रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केलाय. 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीमध्ये मरण पावले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर जी अव्यवस्था महाकुंभच्या निमित्ताने सरकारने दाखवली, त्याचे बळी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले. सरकारी आकडा तीस आहे. पण माझी माहिती आहे की, किमान 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीमध्ये मरण पावले आहेत. सरकार आकडा लपवत आहे. महाकुंभला जाण्यासाठी भाजपकडून ज्या पद्धतीने निमंत्रण दिले जात आहे की जसे हा भाजपचाच सोहळा आहे. लोकांना असे भ्रमित केले जात आहे की, तुम्ही फक्त या. तुमच्यासाठी गाड्या, जेवण, राहण्याची व्यवस्था सर्व काही होईल. मात्र, तसे काहीही नाही. इतकी अव्यवस्था कुठल्याच कुंभमध्ये झालेली नव्हती. काल योगी म्हणत होते की, 50 कोटी लोक आलेत. मग मेले की तिथे सांगा? प्रयागराजला किती लोक मरण पावलेत? सात हजारावर लोक बेपत्ता आहेत, असे त्यांनी म्हटले.
हेही वाचा – शिवराज राक्षे पृथ्वीराज मोहोळ पुन्हा भिडणार? महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
सरकार हा आकडा लपवत आहे. रेल्वेमंत्री सांगायला तयार नव्हते. पण दिल्लीतील रेल्वे प्रशासनाचा एक अधिकारी अचानक बोलला आणि हा आकडा समोर आला. तुम्ही कुंभचा राजकीय व्यापार चालवला आहे. तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळत आहात. तुम्हाला थोडीही माणुसकी नाही. दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी उसळल्याचे आपण पाहत आहोत. मध्यप्रदेशमधून किंवा उत्तर प्रदेशमधून प्रचंड प्रमाणात लोक येत आहेत. तुमचं त्याच्यावर नियंत्रण नाही. लोक रेल्वेच्या खिडकीच्या काचा फोडून आत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. दरवाजे तोडून लोक जात आहे. सरकार काय करत आहे? मोदीजी काय करताय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.