सलग तिसऱ्या दिवशी एसटीच्या फेऱ्या रद्द
पुणे – मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. याचा मोठा फटका एसटी वाहतुकीला बसत आहे. गुुरूवारी दुपारी आंदोनलकर्त्यांनी पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाक्याजवळ केलेल्या बंदमुळे 12 नंतर मुंबईला जाणाऱ्या एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या. तर इतर मार्गावरील काही फेऱ्या रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली. दरम्यान, औरंगाबाद आणि सोलापूरसाठी गुरूवारी बससेवा सुरळीत असल्याचा दावा एसटी प्रशासनाने केला आहे.
गुरूवारी सकाळापासूनच पुण्याहून राज्यातील काही भागात वेळापत्रकानुसार एसटी सुरू होती. मात्र, दुपारी 12.30 वाजता उर्से टोलनाक्यावर आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखल्याने नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने बस रद्द केल्या. त्यामुळे दुपारी 12 नंतर मुंबईला जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या. यामुळे मुंबई, ठाणे, बोरिवली बसेसवर काही प्रमाणात परिणाम होऊन अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर पुणे-दादर मार्गावरील दोन्ही बाजूच्या सर्व बस फेऱ्या काही काळासाठी रद्द करण्यात आल्या होत्या. दरम्यान, दुपारी 4 नंतर हे आंदोलन शांत झाल्याने मुंबई मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
औरंगाबाद, सोलापूर सेवा गुरुवारी सुरळीत
मराठा समाज आंदोलनाचे सर्वाधिक पडसाद मराठवाड्यात उमटले. पुणे-औरंगाबाद महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी चक्कजाम केल्याने सलग दोन दिवस वाहतूक बंद होती. अशीच परिस्थिती सोलापूूर मार्गावरील होती. मात्र, गुरूवारी आंदोलनकर्त्यांनी शांततेचा मार्ग पत्करत रस्ते मोकळे केल्याने वाहतूक सुरळीत झाली. यामुळे गुरूवारी सकाळपासूनच औरंगाबाद, सोलापूर, नाशिक याठिकाणी वाहतूक सुरू करण्यात आली. दरम्यान, सातारा, सांगली, कोल्हापूर या मार्गांवरील बसेसही वेळापत्रकानुसार धावल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रद्द केलेल्या फेऱ्या
भोर, दौंड, नसरापूर, सातारा, मुंबई, ठाणे