श्रीरामपूरमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार? संशयास्पद मृत्यूमुळे शहर बंदची हाक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Rape-1.jpg)
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये एका पाच वर्षांच्या चिमुकलीचा उपचारांदरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे ही घटना घडलेल्या गावामध्ये सध्या तणावाचे वातावरण असून नागरिकांनी श्रीरामपूर शहर बंदची हाक दिली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे ही घटना घडली आहे. मृत चिमुकली घरी परतल्यानंतर तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. त्यामुळे तिला तातडीने श्रीरामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या मुलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, तिचा मृतदेह औरंगाबाद येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याचा अहवाल आल्यानंतर या मृत्यूबाबतचे सत्य समजू शकेल.
या चिमुरडीचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत स्पष्टता नसली तरी तिच्या नातेवाईकांनी अत्याचार झाल्याचा दावा करीत अत्याचार करणाऱ्याला नराधमाला फाशी देण्याची मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्राही त्यांनी घेतला आहे.