शिवसेनेचा दिल्ली ते गल्ली दलबदलू कार्यक्रम : आ. आशिष शेलार यांची टीका
मुंबई | प्रतिनिधी
लोकसभेत शिवसेनेचा सीएए आणि कृषी विधेयकाला पाठिंबा आहे. तर राज्यसभेत या विधेयकाला विरोध आहे. तसेच महाराष्ट्रात प्रथम समृद्धी महामार्गाला विरोध केला. आता श्रेयासाठी पाहणी दौरे सुरु आहेत. मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो बाबतही अशाच आप-मतलबी भूमिका घेतल्या. दिल्ली ते गल्ली असा शिवसेनेचा “दल बदलू” कार्यक्रम सुरुच असल्याची टीका भाजपा नेते आ. आशिष शेलार यांनी केली. नुकतेच त्यांनी या बाबत ट्वीट केले आहे.
दरम्यान शेतकऱ्यांनी तीन कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेनं दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर केला आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला खडेबोल सुनावले. मुलाखतीत ते म्हणाले, जे पक्ष निवडणुकीत सातत्यानं पराभूत होत आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून कृषीकारण नव्हे, तर आपलं राजकारण करायचं आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या हिताची चिंता नाही. त्यांना आपल्या परिवारातील सदस्यांच्या भविष्याची चिंता आहे. शेतकऱ्यांचं भविष्य त्यांच्यासाठी गौण आहे,” असा आरोप मुनगंटीवार यांनी केला. या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचं ४८ वर्ष दोन महिने सरकार होतं. देशात ५२ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचं सरकार होते. ज्याला आपण उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणायचो, मग त्या कृषी क्षेत्रात असं काय झालं? का व्याख्या बदलली याचं कधी चिंतन केलं का? आज काही राजकीय पक्ष मी नेत्यांबद्दल बोलत नाही. त्यांना राजकीय विस्मरणाचा आजार झाला. त्याला आपण पॉलिटिकल अल्झायमर हा शब्द वापरू शकतो,” असं म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर अप्रत्यरित्या निशाणा साधला.