‘शहरी नक्षलवाद ही संकल्पनाच अमान्य’
- युपीए काळातील अटकेची कारवाई चुकीची-चिदम्बरम
शहरी नक्षलवाद नावाचा प्रकारच मला मान्य नाही. याप्रश्नी युपीएच्या काळात झालेली कारवाई चुकीची होती अशी कबुली काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री पी.चिदम्बरम यांनी आज येथे दिली. मात्र, कारवाईवेळी आपण केंद्रात गृहमंत्री नव्हतो अशी पुष्टी जोडण्यासही ते या वेळी विसरले नाहीत.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करून त्यांची मुस्कटदाबी करण्याचे व दहशत पसरवण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे. राफेल विमान खरेदी, फसलेली नोटाबंदी व देशासमोरील इतर ज्वलंत प्रश्नांवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे.
युपीए सरकारच्या काळात २००७ मध्ये फरेरा व गोन्साल्विस या नक्षल समर्थकांना अटक केली होती. मात्र, त्यांच्या विरोधात कुठलेही ठोस पुरावे मिळाले नव्हते. त्यामुळे तो निर्णय चुकीचा ठरला होता अशी कबुली देत चिदम्बरम म्हणाले की, माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन सरकारने वरावरा राव, अरुण परेरा आणि गोन्साल्विस यांना अटक केली आहे. त्यांना आता न्यायालयाच्या आदेशानुसार नजरकैदेत ठेवले आहे. वेगळा विचार करणाऱ्या, वेगळे मत व्यक्त करणाऱ्यांना तुरूंगात धाडण्याची सरकारची कृती निषेधार्ह आहे. मुळात शहरी नक्षलवाद ही संकल्पना आपणाला मान्य नाही. सरकारने अटक केलेले मानवाधिकार चळवळीत काम करणारे विचारवंत, साहित्यिक, कवी आहेत. यात कडवे डावे विचारवंतही असू शकतात. त्यांचा माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे सरकार म्हणत असले तरी तसे पुरावे सादर केलेले नाहीत.