विभागीय आयुक्तांना अजित पवारांकडून जनतेच्या मागण्यांचे निवेदन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/ajit_pawar-6-1.jpg)
पुणे– राष्ट्रवादी कॉंग्रेसने काढलेल्या हल्लाबोल-संघर्ष यात्रेद्वारे शेतकरी, सर्वसामान्य जनता, कष्टकरी यांच्या समस्या जाणून घेतल्या. या निमित्ताने गावागावात, शिवारात जावून जनतेच्या अडचणी आणि मागण्या समजून घेतल्या. या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना निवेदन दिले.
या निवेदनात नमूद केल्यानुसार , गेल्या साडेतीन वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीटीसारख्या संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्याला सरकारने कोणतीच मदत केली नाही. त्यातून राज्यात 15 हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या दोनच शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. त्याही सरकार वेळीच पूर्ण करू शकलेले नाही. गारपीटीने द्राक्षे, कांदा, गहू, ज्वारी, ही पिके जवळजवळ संपूर्ण हातची गेली. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने राज्यातील, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. ऊस, सोसाबीन, तूर, कापूस, उडीद, मूग अशा कुठल्याच उत्पादनांना आज भाव नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा सगळ्याच शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. जनतेच्या अडीअडचणी समस्या सोडविणे, हे घटनात्मक कर्तव्य असतानाही संकटात सापडलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सरकार कोणताही सकारात्मक निर्णय घेत नाहीत. या भागातील विकासप्रक्रिया गेल्या साडेतीन वर्षांत पूर्णपणे ठप्प आहे. एकूण परिस्थितीबाबत जनतेच्या भावना तीव्र असून, या भावनेची सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.