विद्यार्थी आणि शिक्षकांना मिळणार दिवाळीची सुट्टी, शिक्षणमंत्र्यांची घोषणा
मुंबई – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अर्धवट ठेवण्यात आले होते. तर, यंदा अजून शाळाच सुरू झाल्या नाहीत. मात्र, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याकरता ऑनलाईन शाळा सुरू करण्यात आल्या आहे. यंदा शाळा उशिराने सुरू झाल्या असल्याने दिवाळीची सुट्टी मिळणार की नाही असा प्रश्न सतावत होता. मात्र, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलासा दिला आहे. . राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये याकरता राज्यात ऑनलाईन शिक्षणप्रणाली अवलंबण्यात आली आहे. शाळा बंद असल्यातरी शिक्षण चालू ठेवले आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे तसंच त्या संबंधिचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असंही शिक्षणमंत्र्यांनी आज (बुधवार) माध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितले.
अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेशासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाधिवक्ता आणि संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरच प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. कॉलेज सुरू व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे, असं सांगत न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे परंतु ऑनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे याबद्दल शिक्षणमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी व त्यांचे ज्ञानभांडार समृद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील राहील, असा विश्वास शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.