वंचित आघाडीची बी.जी. कोळसे पाटलांना औरंगाबादमधून उमेदवारी
- युती- आघाडीची समीकरणे बिघडणार
मुंबई – वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी परभणी येथील सभेत ही घोषणा केली. कोळसे- पाटलांसह आणखी चार लोकसभा उमेदवारांची नावे आंबेडकर यांनी जाहीर केली. दरम्यान, औरंगाबादमध्ये कोळसे- पाटील यांना उमेदवारी मराठा, दलित व मुस्लिम असं अनोखं समीकरण वंचित बहुजन आघाडीने मांडले आहे. यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीसह शिवसेना- भाजप युतीला धडकी भरणार आहे.
वंचित बहुजन आघाडीची शनिवारी सायंकाळी परभणीत सत्ता संपादन सभा झाली. या सभेत आंबेडकर यांनी मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली. औरंगाबादमधून बी जी कोळसे पाटील, बीडमधून प्रा. विष्णू जाधव, उस्मानाबादमधून अर्जून सलगर, जालन्यातून डॉ. शरदचंद्र वानखेडे यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सध्या चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दलित, ओबीसी व मुस्लिम हा समाज राजकारणातील मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने या आघाडीला सुशिक्षित व तरूणाईचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे भाजप- शिवसेना युतीसह काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या पोटात गोळा आला आहे. वंचित बहुजन आघाडीचा युती- आघाडीला समसमान फटका बसणार आहे. वंचित बहुजन आघाडीने माळी, धनगर समाजाला झुकते माप दिले आहे. बुलढाणा व पुण्याची उमेदवारी माळी समाजाला दिली आहे तर धनगर समाजातील तब्बल 5 उमेदवारांना वंचितने संधी दिली आहे. सांगली, माढा, बारामती, उस्मानाबादसह नांदेडमध्ये धनगर समाजाचे प्राबल्य असलेल्या भागात आंबेडकरांनी उमेदवार हेरून दिले आहे. याचा फटका जसा आघाडीला बसणार आहे तसाच तो भाजपलाही बसणार आहे.
वंचित बहुजन आघाडी लोकसभा उमेदवार
1) पुणे- विठ्ठल सातव (माळी समाज)
2) सातारा- सहदेव अहिवळे (होलार समाज)
3) सांगली- जयसिंग शेंडगे (धनगर समाज)
4) माढा- अॅड. विजय मोरे (धनगर समाज)
5) बारामती- नवनाथ पडळकर (धनगर समाज)
6) कोल्हापूर, हातकलगंले, सोलापूर – उमेदवार जाहीर नाही