राज्यात बोगस बियाणांची विक्री, अशा कंपन्यांना सर्टिफाय करणा-या कृषी अधिका-यांवर कारवाई करा
- माजी खासदार गजानन बाबर यांची मागणी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील खते व बी बियाणे बोगस विक्री करणाऱ्या कंपन्यांवर व त्या सर्टिफाय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
यासंदर्भात माजी खासदार बाबर यांनी राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सोशल मीडियाद्वारे तसेच माध्यमांद्वारे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी खते व बियाणे यांची बोगस विक्री चालू असल्याची माहिती मिळत आहे. याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतिशय आर्थिक नुकसान होत आहे. खते सर्टिफाइड करण्याचे काम अकोला येथील शासन मान्यता कंपनी तसेच सेल्फ सर्टिफिकेशन स्वतः कंपन्या करत असतात. यावर शासकीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण असते. तरी बियाणे बोगस निघत असेल तर कोणत्या आधारे सर्टिफाइड केले जाते. याचा खुलासा करावा.
ज्या कंपन्यातील बियाणे बोगस निघत असतील त्या कंपन्या काळ्या यादीत टाकून त्याच्यावर नियंत्रण असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर शासन करावे. कोरोणा सारख्या साथीच्या परिस्थितीतून सर्व नागरिक जात आहेत. जर अशाप्रकारे बोगस खते बियाणे जर शेतकऱ्यांनी लावली किंवा खते वापरली तर उगवणार काय व अन्नधान्याचा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या समोर उभा राहील. महागाई वाढेल, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल, याला जबाबदार सर्वस्वी सर्टिफाय करणारे अधिकारी व सेल्फ सर्टिफिकेशन करणाऱ्या कंपन्या आहेत.
संबंधितांवर योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी. कार्यवाहीचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशी विनंती बाबर यांनी कृषी संचालक घावटे यांच्याकडे केली आहे. कार्यवाचा अहवाल सादर करावा, अशी मागणी बाबर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.