राज्यात एकाच दिवशी आंदोलन होणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या अंतरिम स्थिगितीनंतर साहजिकच मराठा समाज आक्रमक झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाबाबतचे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी, संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात आला आहे.
“मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आंदोलन केले जाणार नाही. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यात ही आंदोलने होतील. यादरम्यान, बंद पुकारला जाईल. त्याप्रमाणे, येत्या २० सप्टेंबरला मुंबईतीतील विविध ठिकाणी ठिय्या आंदोलनाची शक्यता आहे. १७ सप्टेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन केली जातील, तर २१ सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्यात बंद आणि आंदोलनाची हाक देण्यात येणार आहे”, असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी यापूर्वी जाहीर केल्यानुसार येत्या २३ सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. या परिषदेत राज्यातील पुढील आंदोलनांबाबतचा निर्णय आणि दिशा ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या गोलमेज परिषदेसाठी राज्यभरातून अनेक तज्ञ मंडळी, मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी सहभागी होतील. तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी देखील बैठक पार पडली होती