राज्यात आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई – राज्यात आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा एकदा वादळाचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचे रुपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाऊस पूर्णपणे सक्रिय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र वातावरण बदलल्याने पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या चक्रीवादळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवामानातील बदलामुळे मंगळवारी तेलंगणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुर्गम भागांतही जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि विदर्भातील दुर्गम भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच आपला शेतमाल कोरड्या जागी ठेवावा आणि नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.