युतीसाठी शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला-मा. गो. वैद्य
युतीसाठी शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला अशी टीका आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत म.गो. वैद्य यांनी केली आहे. तसेच जानेवारी महिन्यापर्यंत सरकार राम मंदिरासंबंधी अध्यादेश काढेल असे वाटत नाही असेही मा. गो. वैद्य यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती व्हावी म्हणूनच उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मा.गो. वैद्य यांनी त्यांचे हे मत मांडले आहे.
आपल्याला ठाऊक आहेच की राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या गाठली आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस ते अयोध्येच्या दौऱ्यावर असणार आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी लक्ष्मण किला या ठिकाणी भेट दिली. शिवसेनेने निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराचा प्रश्न पुन्हा समोर आणला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातच उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. आता त्यांच्यावर मा. गो. वैद्य यांनी टीका केली आहे.