मागण्या मान्य होईपर्यंत दूध आंदोलन सुरुच राहणार
गिरीश महाजन आणि राजू शेट्टी यांच्यातील चर्चा निष्फळ
मुंबई – दूधाच्या खरेदीच्या दरामध्ये राज्य सरकारकडून वाढ केली जाईपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहिल, असे या आंदोलनाशी संबंधित नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले. दूधदरवाढीचे अंदोलन थांबवण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात काल रात्री झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय स्वाभीमानीच्या नेतृत्वाने घेतला.
दूधाचा खरेदीचा दर प्रतिलीटर 25 रुपयांइतका निश्चित केल्यास आंदोलन मागे घेतले जाईल, असे राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सरकारने जर डेअरी उद्योगांना खरेदी दर वाढवण्याचे आदेश दिले, तरी आपली हरकत नसेल. मात्र तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहिल, असेही शेट्टी यांनी सांगितले.
दूध पावडर उत्पादकांनी आपल्याशी संपर्क साधून 25 रुपये दराने दररोज 1 लाख लीटर दूध खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. जर या उद्योजकांना हे शक्य होते, तर या उद्योजकांना प्रोत्साहन द्यायला राज्य सरकार उत्सुक का नाही ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने दूधावरील अनुदान 2=3 रुपयांनी वाढवल्याने डेअरी उद्योगांना आणि पावडर उत्पादकांना फायदा होईल. मात्र हा फायदा शेतकऱ्यांना दिला जाईल, याची शाश्वती नाही, असेही शेट्टी म्हणाले.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोलापूरजवळच्या किणी टोलबुथ बंद केल्याने पोलिसांनी काही वाहने पर्यायी मार्गाने वळवली. कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर आणि नाशिक येथून मोठ्या प्रमाणावर दूध संकलन केले जाते. ठाणे आणि पालघर येथून दूध संकलन होऊन ते मुंबई आणि अन्य भागात वितरीत केले जाते.
दूध खरेदी दरामध्ये 5 रुपयांची वाढ करण्यात यावी, यामागणीसाठी राज्यभरात सोमवारपासून दूध उत्पादक शेतकऱ्यंनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा फटका प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांना जाणवला. मात्र आंदोलनामुळे दुधाचा तुटवडा जाणवला नसल्याने आता दूध उत्पादक शेतकऱ्यांबरोबर या शेतकऱ्यांचे कुटुंबीयही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.