महाराष्ट्रात सिनेमागृहे उघडण्यास सध्या मुहूर्त नाही; प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस करावी लागणार प्रतीक्षा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/media-handler.jpg)
दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत उद्यापासून म्हणजे 16 ऑक्टोबर पासून सिनेमागृहे उघडणार असली तरी महाराष्ट्रात मात्र प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. दरम्यान, केंद्राची परवानगी मिळाल्याने देशातील विविध राज्यांत उद्यापासून सिनेमागृहे सुरू होणार असून राज्यात मात्र उद्याचा मुहूर्त टळणार असेच दिसून येत आहे.
कोविड-१९ मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सुमारे सात महिन्यांपासून बंद आहेत. याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वस्त केले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्यातील कोविड -१९ चे संकट मोठे असून या संकटकाळात सिनेमागृहांचे मालक शासनासोबत आहेत याचे समाधान आहे. सिनेमा चालण्यासाठी सिनेमागृहांची आवश्यकता असते हे खरे आहे आणि आपण त्या दिशेने जात आहोत. महाराष्ट्राने पुन:श्च हरिओम करीत कामगारांना काम मिळावे यासाठी उद्योग क्षेत्र सुरू केले. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याबाबत नुकतीच परवानगी देण्यात आली. आता मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे, रेल्वेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी लोकलच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत. राज्यातील सिनेमागृहांबाबतही सकारात्मकता ठेवून निश्चित करण्यात आलेल्या एसओपीनुसार सिनेमागृहे सुरू करण्यात येतील. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. मनोरंजन क्षेत्र हे राज्याच्या अर्थचक्राला गती देणारे क्षेत्र आहे. हे क्षेत्र बंद ठेवण्यात आपल्याला किंवा शासनाला आनंद नाही.
दसरा, दिवाळी, नाताळ असे लागोपाठ येणारे सण यामुळे या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. लॉकडाऊन कालावधीत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे बंद करण्यात आली होती. आता सिनेमागृहे सुरू केल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी येतील, त्यामुळे आताचा काळ हा महत्त्वाचा आहे. परंतु, सिनेमागृहे सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतरही सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची आणि स्वच्छतेची काळजी यालाच प्राधान्य असणार आहे. सिनेमागृहे सुरू झाल्यामुळे या क्षेत्राला गती मिळणार आहे, असे यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी नमूद केले.