भाजप सरकार कोसळले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा राजीनामा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/EKSpxz9UUAAb_zO.jpg)
मुंबई – सर्वाेच्च न्यायालयाचा आज निर्णय आल्यानंतर अजित पवारांनी मला भेटून अजित पवारांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. आता आमच्याकडे बहुमत उरले नाही. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही घोडेबाजार न करता आम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आता मी राज्यपालांकडेल जाऊन राजीनामा देणार आहे. सत्ता स्थापन करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, की विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला संपूर्ण बहुमत दिले. महाराष्ट्रात भाजपला सर्वांत जास्त जागा देऊन भाजपला जनादेश दिला. भाजपने लढलेल्या जागांपैकी 70 टक्के जागा आम्ही जिंकले. शिवसेना फक्त 40 टक्के जागांवर जिंकली. या जनादेशाचा सन्मान करण्यासाठी जनतेच्या मनातील सरकार बनविण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण, जी गोष्ट कधी ठरलीच नव्हती. शिवसेनेला लक्षात आले की नंबर गेममध्ये आपली पॉवर वाढू शकते यामुळे त्यांनी तडजोड सुरु केली. जी गोष्ट कधीही ठरलेली नव्हती, म्हणजे मुख्यमंत्रीपद देण्याची ठरलेले नव्हते. अशा न ठरलेल्या बाबींचा बाऊ करून आम्ही कोणासोबतही जाऊ शकतो, अशी धमकी भाजपला दिली. त्यावर भाजपने तात्विक भूमिका मांडून जे ठरले तेच देऊ असे म्हटले. ते आमच्याऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करू लागले.