भाजप आणि राज्यपालांची राष्ट्रपती राजवटीची खेळी यशस्वी होऊ देणार नाही – बच्चु कडू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Kadu.jpg)
अमरावती – महाविकास आघाडीत बिघाडी करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप आणि राज्यपालांची खेळी आहे, असा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. मात्र भाजप आणि राज्यपालांची राष्ट्रपती राजवटीची खेळी आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा देखील यावेळी कडू यांनी दिला आहे.
भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आघाडी सरकारमध्ये बिघाडी करु पाहत आहेत. तसंच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधीची कारस्थाने ते करत आहेत. मात्र त्यांचा हा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.
तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचाही त्यांनी निषेध केला आहे. मुख्यमंत्र्याच्या हिंदुत्वावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोट ठेवलं होतं. त्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, पत्रातील भाषा पाहता ती असंवैधानिक होती. तसंच राज्यपालांच्या त्या वक्तव्याची तपासणी होणे गरजेचं असल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे.
तर राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झालेलं असताना बच्चू कडू यांनी याच मुद्द्यावरून भाजपला सुनावलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना आणि कोरोना वाढण्याचा धोका असताना विरोधी पक्ष लोकांचा जीव धोक्यात टाकणारी अशी मागणी का करतोय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.”विरोधी पक्ष जरी धार्मिकस्थळं उघडण्याची मागणी करत असला तरी ही वेळ मंदिर मज्जिद उघडण्याची नसून हॉस्पिटल शाळा-कॉलेज कसे उघडता येईल त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.