भाजपच्या ‘बेरजे’च्या राजकारणात निष्ठावंतांची ‘वजाबाकी’!
विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार देताना भाजपने विविध समाजघटक जोडण्यासाठी पाचपैकी तीन जागा ‘आयारामां’ना दिल्या. मात्र या बेरजेच्या राजकारणात पक्षासाठी वर्षांनुवर्षे खस्ता खात एकनिष्ठ राहणाऱ्या निष्ठावंतांची आणि त्यातही ब्राह्मण समाजातील कार्यकर्त्यांची वजाबाकी झाल्याने भाजपच्या एका गटात अस्वस्थता पसरली आहे.
विधान परिषद निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे भाजपचे पाच उमेदवार निवडून जाणे सहज शक्य असल्याने भाजपने बुधवारी राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री विजय ऊर्फ भाई गिरकर, पक्षाचे नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राम पाटील-रातोळीकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश नारायण पाटील व यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निलय नाईक यांची उमेदवारी जाहीर केली.
या पाचपैकी भाई गिरकर व राम पाटील-रातोळीकर हे पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत. पण जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत. तर रमेश पाटील हे कोळी महासंघाचे आहेत. निलय नाईक हे यवतमाळमधील प्रभावी अशा सुधाकर नाईक-मनोहर नाईक यांच्या कुटुंबातील आहेत. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. भाजपने या पाच जणांची निवड करताना प्रदेशाबरोबरच मराठा, बंजारा, धनगर, कोळी अशा समाजांच्या नेत्यांना संधी देत बेरजेचे राजकारण केले. ते योग्य असले तरी या बेरजेच्या राजकारणात केवळ ब्राह्मण समाजालाच वजा करण्यात येत आहे.