‘पीएमसी’च्या खातेदारांचे भर पावसात आंदोलन
मुंबई:- ऐन दिवाळसणाच्या तोंडावर आयुष्यभराची कमाई गमावलेले पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑप. बँकेचे (पीएमसी) खातेदार-ठेवीदार विविध ठिकाणी आंदोलन करून आपला निषेध नोंदवत आहेत. मुंबईत शनिवारी झालेल्या पावसातही सुमारे दोनशे खातेदारांनी एशियाटिक सोसायटीच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले.
पीएमसी बँकेवर रिझव्र्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर आता २७ दिवस लोटले आहेत. अनेक खातेदार आणि ठेवीदारांचे लाखो रुपये या बँकेत अडकल्याने ते हवालदिल झाले आहेत.
काहींचा तर मानसिक धक्क्याने मृत्यूही झाला आहे. त्यामुळे खातेदारांमध्ये प्रचंड रोष आहे. याप्रकरणी रिझव्र्ह बँकेला दोषी ठरवत खातेदारांनी न्यायालयीन लढा सुरू केला आहे.
शीव येथील गुरू नानक शाळा पीएमसीची सर्वात मोठी खातेदार आहे. त्यांनी स्वतंत्रपणे याचिका दाखल केली आहे. न्यायालयात न्याय मिळायला किती काळ जावा लागेल, याची खात्री नसल्याने खातेदारांनी रस्त्यावर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.





