प्रकाश आंबेडकर आणि आठवले यांच्या वेगळ्या तऱ्हा!
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीबरोबर यावे म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते त्यांचा उंबरठा झिजवत असताना, दुसरे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना उमेदवारीसाठी भाजप आणि शिवसेनेला इशारे द्यावे लागत असले तरी उभय पक्षांकडून त्यांना अद्याप तरी प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आघाडीबरोबर यावे म्हणून गेले तीन महिने प्रयत्न सुरू आहेत. आंबेडकर यांनी आतापर्यंत काँग्रेस आघाडीसमोर विविध अटी घातल्या. या अटी आम्ही मान्य करू, पण बरोबर या, अशीच आघाडीच्या नेत्यांची भूमिका आहे. आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने एमआयएमशी हातमिळवणी केली. काँग्रेस एमआयएम पक्षाला कधीच जवळ करीत नाही. आघाडीत आंबेडकर यांनी १२ जागांची मागणी केली. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चापर्यंत जागा आंबेडकर यांच्या आघाडीला सोडण्याची तयारीही दर्शविली होती. संघाला घटनेच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेस काय करणार हे स्पष्ट व्हावे, अशी अट आंबेडकर यांनी घातली असता मसुदा सादर करावा. आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ, असे आश्वासन काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी दिले. यावर काँग्रेसनेच मसुदा तयार करावा, असे सांगत आंबेडकर यांनी काँग्रेसच्या कोर्टात चेंडू ढकलला. काँग्रेसकडून समझोत्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आंबेडकर यांनी २२ मतदारसंघांतील उमेदवारही जाहीर केले.
दोनच दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत पुन्हा तेच मुद्दे आले. तसेच २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. त्यांचे काय करायचे, असा सवाल उपस्थित झाला. आंबेडकर यांना आघाडी करायची नाही, पण काँग्रेसवर सारा दोष ढकलत असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. ‘आमची भूमिका स्पष्ट आहे. ती आघाडीच्या नेत्यांकडे मांडली आहे. काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी त्यावर निर्णय घ्यावा,’ असे प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे.
आघाडी न होण्यामागे प्रकाश आंबेडकर हेच जबाबदार आहेत हे राज्यातील दलित जनतेला दाखवून द्यायचे आहे. यामुळेच शेवटपर्यंत आघाडीसाठी प्रयत्न करू, असे काँग्रेसच्या गोटातून स्पष्ट करण्यात आले.
प्रकाश आंबेडकर यांच्यामागे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने धोशा लावला असतानाच रामदास आठवले यांच्याकडे मात्र भाजप आणि शिवसेनेने पार दुर्लक्ष केले आहे. ‘मी ईशान्य मुंबईतून लढावे, अशी शिवसेनेची इच्छा आहे, पण भाजप नेते त्याला काही दाद देत नाहीत. दक्षिण-मध्य मुंबईतून लढावे, अशी भाजपची इच्छा असली तरी शिवसेना त्याला तयार नाही’ अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली. ईशान्य मुंबई किंवा दक्षिण मध्य-मुंबईपैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला लोकसभेची निवडणूक लढायची असली तरी भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, अशीच आठवले यांची खंत आहे.