Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पाणीप्रश्न मिटला!

११ दिवसांत धरणांतील अनुशेष संपुष्टात; जुलैअखेर गतवर्षीपेक्षा अधिक जलसाठा

जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईकरांसमोर निर्माण झालेले पाणीसंकट तूर्तास दूर झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणांतील जलसाठय़ात तब्बल ३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. जुलैअखेर या तलावांत ८५ टक्के जलसाठा असून तो गतवर्षीच्या जुलैअखेरच्या जलसाठय़ाच्या तुलनेत दोन टक्क्यांनी जास्त आहे.

आतापर्यंत तुळशी, तानसा आणि मोडकसागर हे तीन तलाव पूर्ण भरून वाहू लागले आहेत. तर भातसा आणि मध्य वैतरणा या धरणातही चांगली पाण्याची पातळी वाढली असून धरणे ओसंडून वाहिल्यास आजूबाजूच्या गावांना फटका बसू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

गेल्या वर्षी सुरुवातीला चांगला पाऊस पडला, पण नंतर पावसाने विश्रांती घेतली व धरणात ९ टक्के पाण्याची तूट निर्माण झाली होती. त्यामुळे १० टक्के पाणी कपात लागू करावी लागली होती. यावर्षी धरणे ५० टक्के भरल्यानंतर ही पाणी कपात मागे घेण्यात आली. त्यामुळे पालिकेवर टीका होऊ  लागली होती. धरणातील पाण्याची तूट कशी भरून निघणार असा सवाल केला जात होता. मात्र गेल्या ११ दिवसांत पडलेल्या पावसामुळे पालिकेचा जीव भांडय़ात पडला आहे.

मुंबईला दरदिवशी ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा लागतो. सातही तलाव पूर्ण क्षमतेने भरले तरच हा पाणीपुरवठा करता येतो. सातही तलावांची पाणीसाठय़ाची क्षमता साडेचौदा दशलक्षलिटर आहे. बुधवारी सकाळी सातही तलावात मिळून १२ लाख ४० हजार १२२ दशलक्षलिटर म्हणजेच ८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र अजून दोन लाख दशलक्षलिटर म्हणजेच १५ टक्के पाण्याची तूट शिल्लक आहे. गेल्यावर्षी पाणीसाठा खूपच खालावल्यामुळे यंदा धरणे भरण्यास वेळ लागला. त्यामुळे धरणात पडणाऱ्या पावसाकडे व वाढणाऱ्या पाणीसाठय़ाकडे पालिकेचे आणि मुंबईकरांचेही लक्ष लागले होते. धरणाच्या पातळीची आणि गेल्यावर्षीच्या पातळीही तारखांच्या सापेक्ष तुलना केली जाते. त्यानुसार पाण्याचे नियोजन होत असते. गेल्यावर्षी ३१ जुलैला धरणात १२ लाख ५ हजार ५९७ म्हणजेच ८३ टक्के साठा होता. सात धरणांपैकी तीन धरणे ओसंडून वाहू लागलेली आहेत. उर्वरित धरणांपैकी मध्य वैतरणा धरण ९३.३१ टक्के, विहार ९८.७४ टक्के, भातसा ८४.९३ टक्के तर ऊध्र्व वैतरणा धरण केवळ ६२.६५ टक्के भरले आहे.

तलावांतील जलस्थिती

*  सात तलावांपैकी तुळशी तलाव हा १२ जुलै रोजी भरून वाहू लागला.

* तानसा तलाव २५ जुलै रोजी भरून वाहू लागला.

* मोडकसागर तलाव २६ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला.

* मध्य वैतरणा तलावाचे दरवाजे २७ जुलै रोजी उघडण्यात आले.

* भातसा तलावाचे दरवाजे २९ जुलै रोजी उघडण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button