दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण : माध्यमस्नेही पोलिसांना न्यायालयाने खडसावले
मुंबई :संवेदनशील प्रकरणांतील आरोपींच्या चौकशीतून पुढे येणारी माहिती प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत पोहोचवण्याच्या अतिउत्साही वर्तनाबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी पुन्हा राज्य पोलिसांना फैलावर घेतले.
पोलिसांचा हा अतिउत्साह कायम राहिला तर तो घातक ठरू शकतो, असे सुनावतानाच तपास यंत्रणांचा हा जो काही सावळागोंधळ सध्या सुरू आहे त्याबाबत आपण प्रचंड नाराज असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच हे थांबवण्याचेही बजावले आहे. एवढेच नव्हे, तर काही आरोपींना अटक करण्यात आल्याने त्यांनाच मुख्य आरोपी मानून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणांचा गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू असलेल्या तपासाला पूर्णविराम न देता तो सुरू ठेवण्याचे न्यायालयाने दोन्ही प्रकरणांचा तपास करणाऱ्या सीबीआय आणि राज्याच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) बजावले आहे.
दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांनाही सुनावले
प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रसिद्धीमाध्यमांशी बोलणे योग्य नसल्याचे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. न्यायालयावर विश्वास नसल्याचेच यातून स्पष्ट होत असल्याची खंत न्यायालयाने व्यक्त केली.
कायदेतज्ज्ञांतर्फे स्वागत
नवी दिल्ली : दोन प्रौढांनी परस्परसंमतीने ठेवलेले समलैंगिक संबंध हा गुन्हा नसल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे देशातील ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञांनी स्वागत केले आहे. प्रत्येकाला समानतेसह सन्मानजनक आयुष्य जगण्याचा हक्क असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा ‘साजरा करण्याजोगा’ निकाल असल्याचे सांगून, या निकालामुळे मानवी मूल्ये बदलतील, असे मत माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी व्यक्त केले. कुठल्याही व्यक्तीचा ठरावीक लैंगिक कल असणे हा गुन्हा नसल्याचे ते म्हणाले. या निकालाने एलजीबीटीक्यू समुदायासाठी संपूर्ण समानतेची दारे उघडली आहेत, मात्र अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे, असे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी म्हणाले.