‘दानवेंच्या घसरणाऱ्या जिभेचा शेंडा कापा, 5 लाख मिळवा’
- जालन्यात शेतकरी संघटनेच्या वतीने बक्षीस
जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिभेचा शेंडा कापून आणणाऱ्याला 5 लाख रुपयाचे बक्षीस देणार असल्याची ऑफर शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या वक्तव्यानंतर दिलगिरी व्यक्त करुनही रावसाहेब दानवेंविषयीचा राग कमी झालेला दिसत नाही.
जालन्यात शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात दानवे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. बेताल वक्तव्य करुन शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या दानवेंच्या जिभेचा तुकडा तोडून आणून देणाऱ्यास 5 लाखांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बक्षीसाची रक्कम भीक मागून जमा करण्यात येणार आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे. दानवे यांच्या त्या विधानाचा अर्थ त्यांनी स्वतःची मालमत्ता विकुन शेतकऱ्याची तुर खरेदी केली असा होत असल्याचा दावा शेतकरी संघटनेने केला आहे. दानवेंवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांचा आगामी काळातील दौरा जालना जिल्ह्यात होऊ देणार नाही, असा इशाराही शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय कदम यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मी कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरला, शेतकऱ्यांबद्दल नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शेतकऱ्यांची मनं दुखावली असतील तर दिलगिरी करतो असे म्हणत त्यांनी सशर्त माफी मागितली होती. त्यामुळे झालेल्या चुकीबद्दल दानवे माफी मागत आहेत, की उपकार करत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे.