तत्कालीन राज्यकर्तेच मराठवाड्यातील स्थलांतराला जबाबदार – संभाजी पाटील निलंगेकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/sambhaji-nilangekar-patil-facebook_650x400_51522439783.jpg)
पिंपरी – निजामांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाड्याला वर्षानुवर्षे नैसर्गिक संकटाची झळ सोसावीच लागत आहे. दरम्यान, मुंबई, पुणे परिसरात औद्योगक वसाहती निर्माण होत असताना तत्कालीन राज्यकर्त्यांनी मराठवाड्याचा विचार केला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांवर कामासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली. परंतु, आता राज्यकर्त्यांनी रेल्वे कोच निर्माण करण्यासाठी मराठवाड्यात प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांत हा प्रकल्प सुरू होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात पन्नास हजारहून अधिक रोजगारांची निर्मिती होणार आहे. असे अनेक प्रकल्प मराठवाड्यात आणून स्थलांतरीतांची संख्या रोखण्याची जबाबदारी आपण पार पाडीत आहोत, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पिंपरीत दिली.
मराठवाडा जनविकास संघाच्या मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित सत्कार सहोळ्यात ते बोलत होते. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे, लातूरचे माजी आमदार शिवाजीराव कवेकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी महापौर शैलजा मोरे, नगरसेविका आशा शेंडगे, विधी समितीच्या माजी सभापती शारदा सोनवणे, संजय गांधी निराधार योजनेचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, कार्यक्रमाचे संयोजक अरुण पवार आदी यावेळी उपस्थित होते. काही कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचा योग आल्याने महापौर राहूल जाधव कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत.
संभाजी पाटील म्हणाले की, राजकारण-प्रशासन-शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात मराठवाड्यातील नेतृत्व गुण पहायला मिळाला. परंतु, त्यांची भाषा ही अस्सल मराठवाड्यातली असल्याचे ऐकून मनाला समाधान मिळाले. परंतु, आमच्या भागातील माणूस स्थलांतरीत होत असल्याची बाब आमची मान खाली झुकवणारी आहे. निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याला उशीरा स्वातंत्र्य मिळाले. 70 वर्षानंतरही मराठवाड्याकडे दुष्काळग्रस्त भाग म्हणूनच पाहिले जाते. 500 घरांच्या वस्तीत राहणा-या नागरिकांमधील सुमारे 50 तरूण हे रोजगारासाठी बाहेरगावी स्थलांतरीत होतात. लोकांना बाहेरगावी का जावं लागतं?, याचा विचार करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईला जोडणारा समृद्दी महामार्ग मराठवाड्यातून मंजूर केला. त्यामुळे उद्योग धंद्यांच्या निमित्ताने अवघ्या 3 तासात मुंबईला जाता येईल. गडकरी साहेबांनी 50 टक्के रस्त्यांची कामे मराठवाड्याला दिली आहेत. त्यामुळे या भागातील दळणवळण गतीमान होणार आहे. बीड-परभणीतून चार ते पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत. औद्योगिक गती मिळाल्यानंतर मराठवाड्यातील तरुणांना स्थलांतरीत होण्याची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने सरकार पाऊले टाकत आहे, असेही पाटील निलंगेकर म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संपत गर्जे यांनी केले.
———-