जालन्यात आज कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू
![Be careful! Corona reached its highest point in Maharashtra including Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Coronam-7-1.jpg)
जालना : जालना जिल्ह्यात आज चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत 26 जणांचा बळी गेला आहे. जालना जिल्ह्यात कालपर्यंत कोरोनाबाधित 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र आज सकाळी जालना शहरातील गुरुगोविंदसिंग नगरमधील 50 वर्षीय व्यक्तीचा आणि गांधीनगर भागातील एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून, त्यापाठोपाठ शहरातीलच नाथबाबा गल्लीतील 62 वर्षीय व्यक्तीचा झाला आहे. सदर व्यक्तीला तीन दिवसांपूर्वी जिल्हा सरकारी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
यासोबतच जाफराबाद तालुक्यातील टेम्भुर्णी येथील एका 45 वर्षीय महिलेला आज रविवारी पहाटे जालना येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार करण्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्या महिलेच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे. मात्र ही महिलाही कोरोनामुळेच मृत्यूमुखी झाली असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं जिल्ह्यात आज कोरोनाचे चार बळी गेले असून मृत्यूंचा आकडा 26 झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असून बळींची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळं प्रशासनाबरोबरच नागरिकांमध्येही चिंता वाढत चालली आहे.