‘कर्मचारी किंवा कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास मालकाविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकत नाही’
कारखान्यामधील किंवा एखाद्या कामाच्या ठिकाणी कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असे राज्य सरकारने एका प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये २० एप्रिलपासून ग्रामीण भागातील ठप्प उद्योग व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने काहीप्रमाणात शिथिलतेचे आदेश दिले होते.
मात्र कामगाराला विषाणू लागण झाल्यास मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा सरकारने नवा नियम काढल्याची चर्चा रंगली होती. यासंदर्भात एक पत्रकही व्हायरल झालं होतं . मात्र यावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारने महाराष्ट्रातील कोणत्याही औद्योगिक संघटनेच्या बैठकीमध्येही अशा प्रकारची चर्चा केलेली नाही हे परिपत्रक फॉरवर्ड करु नये तसेच त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूची कोणालाही लागण झाल्यास शासनाच्या आरोग्य विभागामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. चिंता करण्याचे कोणताही कारण नाही. राज्यातील ज्या भागात कारखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे तेथील कारखाना आस्थापनांनी कोरोना आहेरोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात पत्रकात करण्यात आले आहे.