अफगाण प्रकरणात भारताचा पाकवर निशाणा

- संयुक्तराष्ट्रात भारतीय प्रतिनिधींनी मांडली वस्तुस्थिती
संयुक्तराष्ट्रे – संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे राजदूत सय्यद अकबरूद्दीन यांनी सुरक्षा मंडळात अफगाणिस्तान याविषयावर झालेल्या चर्चेत नमूद केले की अफगाणिस्तानात होणारे दहशतवादी हल्ले हे त्यांच्या देशातील घटकांकडून नव्हे तर त्यांच्या शेजारील देशांकडून दहशतीला दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनांमुळेच होत आहेत.
पाकिस्ताननेच तालिबानी नेत्यांना पोसले असून लष्कर ए तोयबा आणि जैश ए महंमद अशा संघटनांनाही त्यांनीच पाठीशी घातले आहे त्यामुळे त्याच आधारावर हे दहशतवादी मृत्यूचे तांडव करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला. अकबरूद्दीन यांनी यावेळी पाकिस्तानचे थेट नाव घेतले नाही. पण त्यांच्या म्हणण्याचा रोख कोणाच्या दिशेने होता हे स्पष्ट आहे.
अफगाणिस्तानच्या भूमीवरून पसरल्या जाणाऱ्या दहशतवादामुळे साऱ्या जगाच्याच शांतता आणि स्थैर्याला धोका असल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानला अधिक मजबुतीने समर्थन व मदत केली पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तालिबानचे लोक मोठ्या प्रमाणावर अफुच्याही तस्करीत गुंतले आहेत असा दावा करून त्यांनी म्हटले आहे की त्यामुळे ही संघटना केवळ राजकीय किंवा दहशतवादी स्वरूपाचे आव्हान निर्माण करीत नाहीं तर ते संघटीतपणे गुन्हेगारांच्या टोळ्याहीं निर्माण करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला.





