आमदारांवर विश्वास नसल्यानेच त्यांना डांबून ठेवण्याची शिवसेना, कॉंग्रेसवर वेळ – आशिष शेलार
मुंबई | महाईन्यूज
आमच्या आमदारांवर विश्वास आहे. त्यांना कुठेही एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. आमदारांवर विश्वास नसल्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना डांबून ठेवण्याची वेळ आली आहे, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी लगावला. भाजपच्या विधीमंडळाच्या गटाची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं.
या पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी शिवसेनेवरही टीका केली. “तुमची दिल्लीतील सोनिया गांधीची युती म्हणजे गोराबाजार आणि आमची बारामतीतील राष्ट्रवादीची युती म्हणजे काळाबाजार, ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे.”असंही त्यांनी म्हटलं आहे. या बैठकीला सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत येणाऱ्या विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करण्यासाठी रणनिती आणि चर्चा करण्यात आली. तसेच, आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा आम्ही प्रस्ताव संमत केला, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला दिलेल्या स्पष्ट जनादेशाचा अपमान, अनादर, हेटाळणी शिवसेनेने केली. गेल्या 30 वर्षाच्या युतीच्या परंपरेला स्व:विचाराला शिवसेनेने तेलांजली दिली,” अशी टीकाही शेलार यांनी शिवसेनेवर केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 23 नोव्हेंबरला शपथविधी घेतल्यानंतर महाराष्ट्रात विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. फक्त सांगलीतील मिरज मतदारासंघाचे आमदार सुरेश खाडे हे अनुपस्थित होते. खाडे यांच्या भावाचा मृत्यू झाल्याने ते या बैठकीला हजर राहू शकले नाही असेही आशिष शेलार म्हणाले.