आण्णांच्या लोकपाल आंदोलनामुळे भाजप सत्तेत – गिरीश महाजन यांची कबुली
राळेगणसिद्धी – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी 2011 मध्ये दिल्ली येथील रामलीला मैदानावर भष्टाचार विरोधी जन आंदोलन केले. त्याला देशभरातून अभूतपुर्व प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण देश भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रेरीत झाला. म्हणून 2014 मध्ये आम्ही सत्तेवर आलो हे आम्हाला माहीत आहे. अशी प्रांजाळ कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
राळेगणसिद्धी येथील ग्रामसभेत महाजन बोलत होते. यावेळी समाजसेवक आण्णा हजारे, उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, सरपंच प्रभावती पठारे, उपसरपंच लाभेश औटी, सुरेश पठारे, शाम असावा, तहसीलदार गणेश मरकड, पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाजन म्हणाले की, देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचे स्वप्न मोदींचे आहे. आम्ही अत्ताच सत्तेवर आलो आहोत. लोकपाल कायदा यावा यासाठी 60 ते 70 वर्ष गेली आहेत. हा कायदा झाला आहे. लवकरच त्या कायद्यानुसार त्यांच्या नेमणुकाही होतील. त्यामुळे या पुर्वीच्या मनमोहन सिंग सरकरला जसे जावे लागले तशी वेळ आमच्या सरकारवर येणार नाही असेही ते म्हणाले.
यावेळी उपसरपंच लाभेश औटी यांनी हजारे यांनी या पुढील काळात आंदोलन करावे परंतु, ऊपोषण करू नये असा ठराव यावेळी मांडला. हा ठराव टाळ्याच्या गजरात मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेचे प्रास्ताविक सुरेश पठारे यांनी तर सुत्रसंचलन सुभाष पठारे यांनी केले.