आठवडाभरात राज्यात सर्वदूर गारवा पसरणार
महाईन्यूज | मुंबई
राज्याच्या बहुतांश भागातील ढगाळ वातावरणाची स्थिती निवळत असून, कोरडे हवामान निर्माण होत आहे. वातावरणातील या बदलामुळे थंडीला पोषक स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या आठवडय़ात राज्यात सर्वच ठिकाणी गारवा वाढणार आहे. काही ठिकाणी दाट धुकेही पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.डिसेंबरच्या सुरुवातीपासून राज्यातील तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार झाले. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळाची स्थिती, तसेच मध्य भागातातील कमी दाबाचा पट्टा याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झालेला आहे.
परिणामी राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी गायब झालेली होती. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिम भागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊसही झाला. सरासरीच्या आसपास गेलेले विदर्भातील तापमान त्यामुळे पुन्हा वाढलेले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या राज्यात सर्वच ठिकाणी कोरडे हवामान निर्माण होत आहे. उत्तरेकडून राज्याच्या दिशेने थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू आहेत. या संपूर्ण आठवडय़ात राज्यात कोरडय़ा हवामानाची स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत गारव्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.